अलाहाबाद रेल्वे स्थानकातील दुर्घटना
11/02/2013 12:59
मौनी अमावस्येनिमित्ताने अलाहाबादच्या त्रिवेणी संगमात महास्नान करून परतत असलेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. अलाहाबाद रेल्वे स्थानकात ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी कुंभमेळ्यातील सेक्टर १२ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला. अलाहाबाद रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ५ आणि ६ वर ही दुर्घटना घडली. काही प्रत्यक्षदर्शीच्या मते सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्र. ६ वरील गाडी पकडण्यासाठी अचानक लोकांची झुंबड उडाली. त्यात फलाटावरील पुलाचा कठडा तुटला आणि ही दुर्घटना घडली.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे ही दुर्घटना घडली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास कुंभमेळ्यातील सेक्टर १२ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला.