Homepage > कोल्हापूर - कोकण मार्गाचे दिड वर्षात सर्वेक्षण
कोल्हापूर - कोकण मार्गाचे दिड वर्षात सर्वेक्षण
07/03/2011 15:01
कोल्हापूर - "कोल्हापूर - कोकण रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होण्यास एक ते दिड वर्षांचा कालावधी लागेल. तांत्रिक बाबी पाहूनच हा रेल्वेमार्ग बनविणे शक्य होईल की नाही यावर शिक्कामोर्तब होईल'' असे रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. कुलभूषण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर आणि मिरज रेल्वे स्थानकावरील सुविधांची पाहणी करण्यासाठी श्री. कुलभूषण येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर भाड्यात प्रवास करता येण्यासाठी रेल्वेकडे जितक्या पायाभूत सुविधा आहेत, त्याचा पुरेपुर वापर केला जात आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात रेल्वेने या भागात फेऱ्या वाढविल्या आहेत. मिरज - पंढरपुरही सेवा या भागासाठी वरदान ठरली आहे.''
ते म्हणाले की, "" कोल्हापुरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज रेल्वे स्थानकाची मुळ इमारत आहे तशीच ठेवून, आवश्यक विकास केला जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य शासन, रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सर्वच कामे तातडीने होणे शक्य नसते.''
प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यावरील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांचीही संख्या वाढली पाहिजे असेही श्री. कुलभूषण यांनी सांगितले.
माल वाहतुकीला रेल्वे हाच पर्याय
श्री. कुलभूषण म्हणाले, ""रेल्वेकडे वॅगन्स मोठ्या प्रमाणात आहे. माल वाहतुक ही आमच्यासाठी उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी मागणी होईल तेवढ्या वॅगन्स उपलब्ध होऊ शकतात. शेतीमाल, अन्नधान्य किंवा औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्च्या मालाची वाहतुक वाढविण्यासाठी ही एक संधी आहे. ''